Sunday, May 10, 2009

कातरवेळ आणि समुद्रकिनारा

कातरवेळी समुद्राकाठी मला
सुंदर कविता सुचली
हाती पेन पेन्सिल नसल्याने
वाळुतच ती मी लिहिली

अशी कविता क्वचितच
कोणी केली असावी
जी वाचण्यासाठी सुर्यानेही
मावळतिची वेळ वाढवली

जे जे काही मनात होते
ते सर्व काही वाळूत कोरले
मनातल्या भावनांचे कोठार
काही क्षणात रिकामे झाले

सुंदर अशी कलाकृती
त्या वाळूत साकार झाली
ढगात लपलेल्या चंद्राची
मग उत्कंठा शिगेला पोहचली

आजूबाजूचे सर्व काही
त्या कवितेत तल्लीन झाले
त्याना जोडीला लाटेचे
छान पार्श्व-संगीत लाभले

काही क्षणात सागराला
तुफान भरती येणार होती
अभय दिलेल्या शब्दाना आता
जीवंत समाधी मिळणार होती

लाटेंच्या तडाख्यात प्रत्येक
शब्द धारतीर्थी पडला होता
फेसाळलेल्या लाटांत मी
शब्द जोडू लागलो होतो

अजूनही ते शब्द जोडण्यासाठी रोज
कातरवेळी समुद्राकाठी जातो
पुन्हा नवीन कविता रचून
तिला वाळूत पुरून येतो
:-अजय कोरपे

1 comment:

PRACHI...... said...

arre yar.. amazing it is..
कसं ज़मतं रे लिहायला..
विचार सही आहेत रे..
kudos mayn...\m/